Skip to content
ग्रामपंचायत खरवते

ग्रामपंचायत खरवते

Kharavate

Menu
  • Menu
    • मुखपृष्ठ
    • गावाविषयी
    • गावातील मंदिरे व श्रद्धास्थाने
    • ग्रामपंचायत कामकाज
    • गावातील उद्योग – व्यवसाय
    • गावातील शैक्षणिक सुविधा
    • गावातील विकासकामे
    • गावातील उल्लेखनीय व्यक्ती
    • ऐतिहासिक वारसास्थळे
    • गावातील जलव्यवस्था
    • जैवविविधता
    • आपली ग्रामपंचायत
    • व्हिडिओ गॅलरी
    • संपर्क

माझी वसुंधरा ५.०

Facebook Twitter Whatsapp Instagram

माझी वसुंधरा अभियान ५.०

गुरववाडी येथे वनराई बंधारा
पर्यावरण पूरक होळी
कापडी पिशव्या शिवणे प्रशिक्षण
ग्रामस्थांना कापडी पिशवीचे वाटप
पर्यावरणपूरक गणेशोत्सव - निर्माल्य कलश
नाल्यांची साफसफाई
रस्ते स्वच्छता अभियान
रस्ता व मंदिरांची साफसफाई
ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटप
जनजागृतीसाठी वॉल पेंटिंग
ग्रामस्थांना स्थानिक वृक्षांच्या रोपांची भेट
पर्यावरण दूतांमार्फत शाळांमध्ये जनजागृती उपक्रम
महिलांना हळदीकुंकू उपक्रमाअंतर्गत भाजीपाला बियाण्यांचे वाटप

नमस्कार.

मी नेहा दिनेश कुडाळी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत खरवते, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आपल्या ग्रामपंचायत खरवतेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेतला आहे या अभियानाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे.

केवळ एक स्पर्धा किंवा बक्षीस मिळविणे या दृष्टिकोनातून या अभियानामध्येमध्ये सहभागी न होता आपण या सृष्टीचे देणे लागतो या नात्याने आपण सर्वजण पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वपूर्ण अभियानात सहभागी झालो आहोत. ग्रामपंचायत अधिकारी म्हणून, माझे एकच उद्दिष्ट आहे – पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक सकारात्मक समाज निर्माण करणे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास या थोर महापुरुषांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी वनसंपत्तीचे महत्त्व पटवून सांगितले. यांचे विचार आचरणात आणण्यासाठी तसेच पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मा. श्री. सुहास पंडित साहेब यांच्या प्रेरणेतून व बदलत्या वातावरणाला सामोरे जाण्यासाठी थोडेफार प्रयत्न आपणही करावेत या जाणिवेतून हे अभियान राबविण्याचा दृष्टिकोन तयार झाला.

ग्रामपंचायत खरवतेचा कार्यभार स्वीकारून सहा वर्षे झाली. या सहा वर्षात गावाची ओळख झाली होती. आपण या गावात सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी व जेष्ठ ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबवू शकतो याची खात्री झाली व ग्रामपंचायत खरवतेचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच व सदस्य ,कर्मचारी, संगणक परिचालक तसेच गावातील काही ज्येष्ठ नागरिक यांना विश्वासात घेतल्यानंतर सर्वांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळे श्री गांगेश्वर मंदिर येथे दिनांक २२/०७/२०२५ रोजी प्रथम वृक्षारोपण कार्यक्रम व वसुंधरा अभियान शपथ घेऊन अभियानाचा श्री गणेशा करण्यात आला. त्यानंतर माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून पर्यावरणातील भूमी,वायू, जल, अग्नी,आकाश या पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी वर्षभरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध पर्यावरणीय दिन साजरे करून एकूण ८४ उपक्रम राबविण्यात आले व पंचतत्वांचे संवर्धन व संरक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड, स्थानिक जातींच्या बियांचे संकलन करून बीज गोळे बनविणे व जंगलामध्ये फेकणे, रोपवाटिका तयार करणे ,मॅरेथॉन स्पर्धा, वृक्ष रक्षाबंधन उपक्रम, रानभाजी महोत्सव, स्वच्छता अभियान, सार्वजनिक ठिकाणी सौर पथदिवे, अंगणवाडीमध्ये सोलार लाईट इंस्टॉलेशन, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ सेल्फी पॉईंट द्वारे पंचतत्त्वांची जनजागृती, विविध ठिकाणी वॉल पेंटिंग मार्फत जनजागृती, नवीन जलस्त्रोत वाढविण्यासाठी सिंचन विहिरी, जलजीवन मिशन मार्फत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गावांमध्ये विविध ठिकाणी पाणवठे व पक्षांसाठी धान्य ठेवण्यासाठी पिंजरे तयार केले. पर्यावरण पुरक शाश्वत सण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश उत्सव ,दीपावली दसरा, होळी सण साजरे करणे,जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे, बचत गटांना विविध प्रशिक्षण , मोफत आरोग्य शिबिर, घनकचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन वाटप, प्लास्टिक बंदी साठी कापडी पिशव्यांचे वाटप, रेन वॉटर हार्वेस्टिंग व पाणी जिरविण्यासाठी शोष खड्डे कामे करण्यात आली. गावामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमांमध्ये महिलांना भाजी बियाण्यांचे वाटप करणे,साधारण 80 ते 120 वर्षांपूर्वीच्या वृक्षांची ग्रामपंचायत कार्यकारणी व जैवविविधता समिती यांच्यामार्फत वृक्ष गणना करून जिओ टॅगिंग करण्यात आले. व हे पुरातन वृक्ष संवर्धन करण्यासाठी व ते न तोडण्याचा ग्रामसभेने दिनांक ०७/०२ /२०२५ रोजी ठराव मंजूर केला आहे. तसेच ग्रामपंचायत खरवते च्या माध्यमातून व लोकसहभागातून गावाची एक परिपूर्ण वेबसाईट बनविण्यात आली आहे.

अशाप्रकारे अनेक प्रेरणादायी व निसर्ग संवर्धनाचे पर्यायाने भविष्यकालीन पिढ्यांना सुरक्षित जीवन देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती बेताची असल्याने बरेचसे उपक्रम लोकसहभागातून व श्रमदानातून राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान 5.0 हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी, कर्मचारी, संगणक परिचालक, युवा प्रशिक्षणार्थी, गावातील ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण दूत, सर्व जि.प.शाळा अंगणवाडी,माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी, महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. पर्यावरण रक्षणासाठी यापुढे गावात अनेक पर्यावरण दूत निर्माण व्हावेत व यापुढे देखील हे अभियान निरंतर राबविण्यात यावे व खरवते गावाचा शाश्वत विकास साधावा हिच सदिच्छा.

धन्यवाद…!

 

-नेहा दिनेश कुडाळी, 

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत खरवते, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी

शुभेच्छुक...

ग्रामपंचायत खरवते

© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress