आपले खरवते गाव
खरवते हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक छोटेसे, पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हे गाव रत्नागिरी शहरापासून ६० किमी आणि राजापूर शहरापासून १० किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ९५८-५४-२१ हेक्टर असून, त्यातील ११५.०२ हेक्टर जमीन शेतीयोग्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १४१६ एवढी आहे. गावाच्या दक्षिणेस कोदवली, पश्चिमेस केलवडे, पाथर्डे आणि पेंडखळे ही गावे आहेत, तर उत्तरेस कळसवली आणि पूर्वेस ओणी व गोठणे-दोनिवडे ही गावे येतात.
गावातील समाजजीवन आणि अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती, बागायती, नोकरी आणि मजुरीवर आधारित आहे. खरवते गाव हे ९ वाड्यांमध्ये विभागले गेले आहे. गावठणवाडी, कोंडवाडी, वाणीवाडी, हेदाडवाडी, माटलवाडी, बौद्धवाडी, कोष्टीवाडी आणि गुरववाडी या आठ वाड्यांसोबतच प्रशासकीय दृष्टिकोनातून वेगळ्या महसूल गावाचा दर्जा असलेली मधलीवाडी देखील खरवते गावाचा अविभाज्य भाग आहे.
गावाचा इतिहास पाहता, सुमारे ५०० ते ७०० वर्षांपूर्वी चौगुले (मूळचे ‘कोचरे’ कुटुंब) खरवते गावात येऊन स्थायिक झाले आणि तेथूनच गावाचा विस्तार झाला. त्या काळात गावाचा दस्त विशाळगडाकडे भरला जात असे. सध्या चौगुले घराण्याची दहावी पिढी गावात वास्तव्यास आहे. कालांतराने वेगवेगळ्या व्यवसायांच्या निमित्ताने विविध जाती-धर्मातील लोक गावात स्थायिक झाले. गावात कुणबी, ब्राह्मण, गुरव, वाणी, बौद्ध, सोनार, कोष्टी, सुतार, धनगर आणि मुस्लिम समाजाचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहतात.
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत आणि इतर सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी या संस्था सातत्याने कार्यरत असतात. गावातील उत्तम प्राथमिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी झाल्यामुळे आज अनेक विद्यार्थ्यांचे जीवन सुकर झाले आहे. याच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर आज गावात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, बँक अधिकारी आणि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या तरुणांची संख्या लक्षणीय वाढली आहे, जे गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. खरवते गाव हे आपल्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच ऐतिहासिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असून, येथील ग्रामीण जीवनशैली अजूनही परंपरागत मूल्ये आणि आधुनिकतेचा योग्य समतोल राखून पुढे जात आहे.
गाव नकाशा

वाडीनिहाय लोकसंख्या व कुटुंबसंख्या

शुभेच्छुक...




